शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

थंडीच्या ऊबदार गोष्टी !

 

"He is wise like an angel
and adamant like a devil"
ग्रेस ('वाऱ्याने हलते रान') एके ठिकाणी
असे वर्णन करतात हिवाळ्याचे !
यंदा तर कहर झाला होता थंडीचा !
मराठवाडा कधी नाही ते एवढा काकडला !
**
सरती थंडी.. सरत्या आठवणी !
उबदार शालीत सांभाळलेल्या आठवणी-क्षण
आता थंडी ओसरताना, शाल बाजूला करताना..
या क्षणांना मिळालेल्या कोवळ्या उन्हांनी
एक प्रसन्नता बहाल केलीय.
**
गुलमर्ग .. टूर नेला आणि श्रीनगर करून
इथे आलो.. वाह... गेली दोन दिवस बर्फ पडलेला..
कॉटेज भवती तर बर्फाचं साम्राज्य,
आणि तो मुक्काम !
न विसरता येणारी थंडी, हिटरही किती काम करणार?
रजया तरी किती म्हणून मागवणार ?
रात्रीच्या जेवणानंतर दोनदा कॉफी झाली तरी
फरक नाही.. कसा बसा झोपलो
पहाटे चारला जाग आली आणि
खिडकीच्या तावदानावर आवाज ऐकू येऊ लागले,
बाहेर बर्फ पडत होता...
थंडी ला "कडाक्याची" म्हणणे सुद्धा कमी वाटावे
असा तो गारठा .. त्या पहाटे रूम केट्ल कितीदा
गरम केली आणि किती चहा झाला याची मोजदाद नाही.
ही देखील एक आठवण असू शकते.
**
दिवाळीच्या काळातील आजोळी अनुभवलेली
थंडी आठवणींच्या शालीत एक ऊब देणारी,
न्हाणी घर म्हणजे फक्त भिंती आणि वर आभाळ,
गंगाळातील चटका देणारं पाणीही कोमट
वाटणाऱ्या थंडीतील पहाटे चार-पाच वाजताचं अभ्यंगस्नान
आणि नंतरची हुडहुडी मजेदार असायची.
**
साताऱ्याला नवीन राहायला घरात आलो,
नोव्हेंबर महिना आणि येणे अपरिहार्य होते.
खिडक्यांना काचा लावायच्या राहिलेल्या,
मोठ्ठ्या खिडक्या कशाला केल्या असतील बरं ?
हा प्रश्न त्रयस्तासारखा आम्हीच एकमेकांना विचारला .
एक तर त्यावेळी त्या भागातील हे एकमेव घर,
त्यामुळे पूर्ण मोकळा परिसर , थंडीचा जोर अधिक!
लोखंडी टोपल्यात शेकोटी पेटवली..
नुसत्या जाळाकडे बघूनही ऊब !
त्यानंतर कितीतरी वर्ष प्रत्येक थंडीला
टोपलं, लाकडं -कोळसा आणि
नंतर घरभर धूर ठरलेला.
घरातली ही थंडी डोळ्यात पाणी आणणारी !
**
गंगोत्री परिसरात कॅम्पिंग करताना रोज पहाटेच उठावं लागायचं
कारण कॅम्प किचनची जबाबदारी (जेवण बनवायला कुक सोबत होते, पण कमी जास्त पडणारे साहित्य आणि सकाळीच ट्रेक सुरु होण्यापूर्वी मार्केटचा राउंड ठरलेला. यामुळे पाच साडेपाचला दिवस सुरु व्हायचा ) जून असला तरी तिकडे थंडी भयंकरच. तशात भल्या पहाटे उठून टेन्ट मधून बाहेर येणं जीवावर यायचं.. पण बाहेर आल्यावरचा माहौल आणि एक मोठ्ठा मग भरून समोर येणारा चहा.. आहाहा..!
अजूनही त्या दिवसातील सूर्योदयापूर्वीची बोचरी थन्डी आणि चहाच्या वाफा.. भुला नही अभी भी.
**
**
आपल्याकडे थंडी आली की, घरातील ज्येष्ठांना एक वेगळाच उत्साह असतो ! कशाचा ?
लाडू वगैरे ठीक आहे, पण घरात सगळ्यांनी स्वेटर, बाहेर पडताना मफलर घातले की नाही,
यासोबतच "कानाला काही बांधून जा!" ही प्रेमळ सूचना आणि ..
अनेक घरात बघत असतो..
देवळात जसं उत्सवांप्रसंगी गाभाऱ्यातील देवाला सजवलं जातं, नटवलं जातं.
घरी कृष्णाष्टमी, महालक्ष्मी आणि गणपतीत जशी दृश्ये दिसतात.
तसंच आमच्याकडे थंडीच्या दिवसांत आणखी एक दृश्य असतं.
तसं ते अनेकांकडेही असेलच म्हणा !
घरात गुरूंचे एक लाकडी कटआऊट आहे,
दर वर्षी थंडी आली की, आई त्या कटआऊटला
शाल पांघरते, कधी डोक्याला उपरणं बांधते तर कधी कानटोपीही घालते.
माहिती असते की ते लाकडी कटआऊट आहे,
माहिती असतं की, देव दगडाचा आहे..
पण तरी एखाद्या माणसासाठी,
घरातील चालत्या बोलत्या व्यक्तीसाठी , प्राण्यांसाठी
केली जाणारी कृती जेव्हा मूर्तीसाठी केली जाते
तेव्हा चकित व्हायला होतं.
थंडीत डोक्याला-कानाला काही बांधून जा
म्हणणारी ज्येष्ठ पिढी .
सश्रद्ध भावनेतून थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून
मूर्तीलाही कानटोपी-शाल, उपरणं पांघरणारी
ही मंडळी बघितली की,
पटतं बाहेर कितीही थंडी असली तरी
आपल्याकडे संस्कारांचा गाभारा मात्र ऊबदार आहे !

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

दुभंगणारा प्रवाह - ओंजळीतील ओहोळ



एके दिवशी सकाळीच शेजारी घरी आले,
"अरे ! सुबह सुबह कैसे ?"
"बच्चे की शादी है.. आपका मनू कहां है ? "
'है .. ' म्हणत मी चिरंजीवाला आवाज दिला,
तो येताच याने त्याच्या हाती बॅग दिली..
" ड्रेस का कपडा है, शादी के पहले सिलाना
और दावत मे पहनके आना!"
असं मुलाला दटावत नमस्कार करून तो निघून गेला..
मग आपल्या रितीरिवाजाप्रमाणे
त्यांना सहकुटुंब बोलावून आहेर झाला..
ही देवाण घेवाण सुरु असते..
**
आणखी आमचे एक अजीज मित्र, समोरच राहतात,
ते न चुकता रमजान मध्ये खास बोलावतात,
इकडून दिवाळी फराळ जातो.
काही वर्षांपूर्वी आई आजारी होती,
नियमित फळफळावळ, सोबत ख्याली खुशालीचा
संदेश मिळत राहिला.
मी गावी गेलो की, आवर्जून त्यांच्या मुलांपैकी
कुणीतरी घरी चौकशी करून जातं ..
काही अडचण आहे का विचारतं !
**
सात -आठ वर्ष आमच्याकडे एक चाचा गाडीवर होते,
बालवाडीत असलेल्या माझ्या मुलाला कधी ते एकटेच
जाऊन आणत .. घरात कुणीच कधी काळजी केली नाही.
माझं लहानपण जाफरगेट भागात गेलेलं,
तिथे कधी बानूची आई भेटली तर कधी कुणी,
शाळेत एक मित्र होता, त्याला कॉमिक्सची खूप आवड खिजर नाव बहुदा. मला तेव्हा ते अप्रूप होतं, एवढे कॉमिक्स घेणे परवडत नव्हते, मग तो आग्रहानं मला घरी घेऊन जायचा आणि बाइंडिंग केलेले कॉमिक्सचे गठ्ठे वाचायला द्यायचा.. एक शिरीन होती, एकत्र डब्बा खात असू. हे दोन्ही मित्र पाचवीच्या आधीचे.
**
हे आज का आठवावं ?
दुभंगत जाणाऱ्या प्रवाहाची चिंता करावी,
की या छोट्या ओहोळांना ओंजळीत धरावं ?
काळजी आणि काळीज एक वेलांटीचा फरक !
पण बेबंध झालं की दोन्हीचा ठोका चुकतो.
आज समाज काय विकतोय ?
कोण खरेदी करतोय .. कोण बोली लावतोय..
आकलनापलीकडे जातोय आपण !

रविवार, ३० जानेवारी, २०२२

रिक्षावाला शिताफीनं वळवतोय हँडल !

रिक्षावाला शिताफीनं वळवतोय 
आयुष्याचं हँडल !



रिक्षा चालवतानाच तो आपली कथा- व्यथा सांगत होता. जिद्दीचा तो प्रवास..रामनगर भागात राहणा-या रिक्षावाल्याला आपल्या आयुष्यात राम सापडला-अर्थ सापडला. स्वार्थ बाजूला सारत त्याने ' कर्म' केले त्याची कहाणी!

***

मागच्या आठवड्यात आम्ही एक वेगळीच गंमत केली,

बहिणीकडे जायचं होतं...गाडी चालवणं जीवावर आलं होतं.

जाणं भाग. ...ठरवलं आज रिक्षाने जाऊया.

मी खूप दिवसात रिक्षाने शहरातून प्रवास केला नव्हता, आज करावा म्हटलं. मग सहकुटूंब रिक्षा प्रवास झाला. जाताना आणि येताना. गाडी असूनही रिक्षाने आलो याचे बहिणीलाही नवल वाटलेपण आमचे स्वभाव बघता आम्ही अशा गंमती जमती आणि ऑड गोष्टी करणार हे तिनेही गृहीत धरल्याने यावर फार चर्चा झाली नाही.

परतीला आम्ही जालना रोडवर आलो, एक रिकामी रिक्षा दिसली ..हात केला , तो थांबला. तसे आम्ही साता-यात येणार का म्हणताच त्याने मान हलवत खूण केली. आत बसलो तिघेही.

रिक्षा स्वच्छ आणि चालकही गणवेशात. आतमध्ये लायसन्स फोटोसह लटकवलेले..नाव फोन नंबरसह.

**

नाव तर कळलं होतं. साता-याला जायला पंधरा-वीस मिनिटं लागणार होती. संवादाला सुरूवात झाली.

हळू हळू तो खुलत गेला..आणि एका जिद्दीचा

हरता आयुष्याला भिडलेल्या,

आपल्या नव्या पिढीसाठी

मोठं स्वप्न डोळ्यात घेऊन

रोजचा दिवस साजरा करणा-या

माणसाचा परिचय झाला !

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवताना

तेवढाच कुल राहणारा रिक्षावाला कळला.

सामान्यांत असलेली ऊर्जा जाणवली.

सहा बहिण भावंडांपैकी हा एक, जालना जिल्ह्यातील एका खेड्यांतून आलेला. वडील कुठेसे नोकरीला होते, याचे शिक्षण अर्धवट राहिले, मग चिकलठाण्यातील एका कंपनीत काही वर्ष नोकरी केली. भावांना मात्र तो शिकण्यासाठी मदत करू लागला. स्वतःच्या शिक्षणावर पाणी सोडून...

नोकरी पटेना म्हणून मग एकाची रिक्षा भाड्याने चालवायला सुरूवात केली...शाळेची मुलं दोन शिफ्टमध्ये..आणि असं करता करता तीन वर्षापूर्वी त्याने स्वतःची रिक्षा घेतली..एक छोटासा प्लाॅट घेऊन दोन खोल्यांचं घर बांधलं..दरम्यान बहिणींची लग्न

भावांचे शिक्षण आणि याचा संसार सगळीच कसरत!

आज दोन लहान मुलं.

"मुलगा नववीला गेलाय, मुलगी बारावीला. तिला शिकवतोय..पी.आय. करायचंय..पोलिसात जाणार!" हे सांगताना तो जेव्हा मागे वळून माझ्याकडे बघत होता . तेव्हा त्याच्या डोळ्यात एकाचवेळी कृतार्थता, चमक आणि स्वप्नं मला दिसली.

समाधानाने तो सांगत होता..

तरी एक खंत बोलण्यात होती,

मला स्वतःसाठी काही करता आलं नाही.

भावाला पस्तीस हजार पगाराची नोकरी आहे, त्याचा मुलगा शिकून पुढे पुण्यात आयटी करतोय..

भावाने आता मोठा प्लाॅटही घेतलाय.

मी अजून रिक्षा चालवतोय..

दैवाला दोष देता, आयुष्याचं हँडल शिताफीने वळवत येणारे प्रत्येक सिग्नल पाळतोय..

अॅक्सलेटरवरचा हात कायम आहे.

संधी येईल..यावी..वेगासाठी.

लढ मित्रा!

तू चांगलं केलंस ..चांगलंच होईल.



थंडीच्या ऊबदार गोष्टी !

  "He is wise like an angel and adamant like a devil" ग्रेस ('वाऱ्याने हलते रान') एके ठिकाणी असे वर्णन करतात हिवाळ्याचे ...